बाबूराव बागूल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बाबूराव बागूल | |
पूर्ण नाव | बाबूराव रामजी बागूल |
टोपणनाव | आबा |
जन्म | जुलै १७, १९३० विहितगाव, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | मार्च २६, २००८ नाशिक, महाराष्ट्र, भारत |
कार्यक्षेत्र | साहित्य |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
चळवळ | मराठी दलित साहित्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | मी जात चोरली होती मरण स्वस्त होत आहे |
प्रभाव | बाबासाहेब आंबेडकर कार्ल मार्क्स अण्णा भाऊ साठे |
बाबूराव बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्याकरता ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
बाबूराव बागूल जुलै १७, १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ’विहितगाव’ नावाच्या खेड्यात जन्मले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीचःई भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणार्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले.
त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरी विचारांचा प्रभाव शाळकरी वयात असलेल्या बागुलांवरही पडला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठ्यांच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.
१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यमुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्यावर घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुअरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ’जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.
१९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्र्यांच्या ’नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ’नवयुग’ व ’युगांतर’ या साम्यवादी नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणार्या त्यांच्या कथा १९६३ साली ’जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ’मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथाकादंबर्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याचःई नवी लाट आली.
बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा ’जनस्थान पुरस्कार’ २००७ साली त्यांना देण्यात आला.
मार्च २६, २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.
[संपादन] प्रकाशित साहित्य
[संपादन] कादंबरी
- सूड
- अघोरी
- कोंडी
- पावशा
- सरदार
- भूमिहीन
- मूकनायक
- अपूर्वा
[संपादन] कथासंग्रह
- जेव्हा मी जात चोरली होती
- मरण स्वस्त होत आहे
[संपादन] कवितासंग्रह
- वेदाआधी तू होतास
[संपादन] वैचारिक
- आंबेडकर भारत
- दलित साहित्य: आजचे क्रांतिविज्ञान