वनमाला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वनमाला (पूर्ण नाव: सुशीलादेवी बापूराव पवार) (मे २२, १९१५ - मे २९, २००७(ग्वाल्हेर)) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.
[संपादन] संदर्भ
- विशेष विनंती: खालील मजकूर 'ई-सकाळ' ३१ मे, २००७ च्या अंकातून संदर्भाकरिता उतरविला आहे. खालील मजकुरातून संदर्भाकरता माहिती घेऊन लेख संपादणे अपेक्षित आहे. लेख संपादताना कृपया खालील मजकूर तंतोतंत चिकटवू नये/ कॉपी करू नये. संदर्भाकरता वापरून झाल्यावर ई-सकाळवरून उतरवलेला हा मजकूर उडवून टाकावा
ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांचे निधन
पुणे, ता. ३० - "श्यामची आई' या चित्रपटातील आईच्या भूमिकेने अजरामर झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला ऊर्फ सुशीलादेवी बापूराव पवार (वय ९२) यांचे काल ग्वाल्हेर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे भगिनी लेखिका सुमती धनवटे आणि अन्य भावंडे, असा परिवार आहे.
वनमाला यांचा जन्म २२ मे १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानातील सरदार होते. त्यामुळे त्यांचे बालपण ऐश्वर्यात गेले. त्यांनी "बी. ए.'ची पदवी मिळविली होती; तसेच त्या "बीटी'देखील झाल्या होत्या. पुण्याच्या आगरकर हायस्कूलमध्ये त्यांनी काही वर्षे अध्यापनाचे कामही केले होते.
नागभूषण नवकुमार आणि लच्छूमहाराज यांच्याकडून त्यांनी नृत्याचे मार्गदर्शन घेतले होते. पं. सदाशिवराव अमृतफुले, चम्मनखॉं आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. देखणे व्यक्तिमत्त्व आणि नृत्य-गायन कलेची ओढ यामुळे चित्रपट-नाटकांत भूमिका करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घरातील विरोध पत्करून १९४० मध्ये त्यांनी "लपंडाव' या मराठी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. आचार्य अत्रे यांच्या "श्यामची आई' चित्रपटातील त्यांची "आई'ची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली, त्याशिवाय त्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले.
"सिकंदर' या चित्रपटाद्वारे १९४१ मध्ये त्यांनी हिंदी चित्रसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर "आँखमिचौली', "वसंतसेना', "महाकवी कालिदास', "बाईलवेडा', "पायाची दासी', "हातिमताई', "शरबती आँखे', "परबत पे अपना डेरा' यांसारख्या तब्बल ४० मराठी-हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. चित्रपटांप्रमाणेच नाटकांतही त्यांनी ठसा उमटविला. "संगीत संशयकल्लोळ'मध्ये त्यांनी "कृत्तिके'ची भूमिका केली, तर "लग्नाची बेडी'मधील त्यांची "रश्मी' लोकप्रिय झाली. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने त्यांना "व्ही. शांताराम पुरस्कारा'ने सन्मानित केले होते. "परतीचा प्रवास' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गेल्या एप्रिलमध्ये त्या पुण्यात येणार होत्या; पण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत.
""रुपेरी पडद्याने आजवर अनेक अभिनेत्री पाहिल्या; पण "श्यामची आई'मधील भूमिका दुसरी कोणी अभिनेत्री करू शकेल, असे मला आजही वाटत नाही. "लग्नाची बेडी'त "रश्मी'ची भूमिका करून आल्यानंतरही "आई'च्या भूमिकेत त्या सहज समरस व्हायच्या, अशा शब्दांत माधव वझे यांनी श्रद्धांजली वाहिली. "संशयकल्लोळ'मध्ये त्यांच्यासह भूमिका करण्याची संधी मिळाली हे भाग्य, असे सांगत जयमाला शिलेदार यांनीही वनमालाबाईंना श्रद्धांजली वाहिली.